जालना हादरलं! गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून ११० सिलिंडरची धाडसी चोरी

जालना तालुक्यातील रामनगर परिसरात एक धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला असून गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ११० गॅस सिलिंडर लंपास करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
चोरीस गेलेल्या सिलिंडरची किंमत सुमारे ४ लाख ५१ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे सध्या नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरीला जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
या घटनेत ९६ घरगुती सिलिंडर, १२ व्यावसायिक (निळ्या रंगाचे) सिलिंडर आणि ५ किलोचे २ सिलिंडर असा एकूण ११० सिलिंडरचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एजन्सी बंद असताना चोरट्यांनी हा डाव साधल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरीचा तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ग्राहकांनी संबंधित ऑईल कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप किंवा ‘Aadhaar FaceRD’ ॲपच्या माध्यमातून घरबसल्या काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यास गॅस सबसिडी सुरळीत सुरू राहण्यास मदत होणार असून भविष्यातील पुरवठा अडचणी टाळता येणार आहेत.



