वैकुंठ चतुर्दशीनिमित्त ४४ चित्ररथांनी सजली त्रिपुरी पौर्णिमा मिरवणूक

वैकुंठ चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर रामटेक नगरी भक्तिभावाने उजळली होती. भारतीय जनसेवा मंडळ, रामटेकतर्फे आयोजित त्रिपुरी पौर्णिमा वैकुंठ चतुर्दशीची ४४ वी भव्य शोभायात्रा अत्यंत दिमाखात पार पडली. या शोभायात्रेत ४४ आकर्षक झाक्या आणि चित्ररथ सहभागी झाले होते, ज्यात त्रेतायुग, द्वापारयुग, स्वातंत्र्यकालीन भारत, आणि आधुनिक वैज्ञानिक भारताचे दर्शन घडविण्यात आले. शोभायात्रेच्या मार्गावर हजारो भाविकांनी जयघोष करत सहभागी झाक्यांचे स्वागत केले. या मिरवणुकीचा प्रारंभ अठरा भुजा गणेश मंदिरापासून झाला आणि मार्गक्रमण करत मा. कालंका मंदिर, शिकला माता मंदिर, शास्त्री चौक, बस स्टॉप, गांधी चौक, लंबे हनुमान या ठिकाणांवरून जात आदर्श विद्यालयाच्या पटांगणावर समारोप झाला. समारोप प्रसंगी विविध झाक्यांना व चित्ररथांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते टीव्ही अभिनेता गजेंद्र चौहान, ज्यांनी महाभारतात “युधिष्ठिर”ची भूमिका साकारली होती.
कार्यक्रमाला खासदार श्यामकुमार बर्वे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी अर्थमंत्री राजेंद्र मुळक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोत्तदार हे मान्यवर उपस्थित होते. या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाने रामटेक नगरीत भक्तीचा महासागर साकारला.



