उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

अमरावती : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि संभाव्य उष्माघातावर प्रभावी उपाययोजना राबवता याव्यात, यासाठी उष्मालाट जनजागृती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. ही कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे पार पडली.
कार्यशाळेचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन एडीआरए इंडिया आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
प्रमुख अधिकारी आणि तज्ज्ञांची उपस्थिती
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार नितीन खटके, आदित्य खंडारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, जिल्हा साथरोग अधिकारी श्री. अली, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे, क्षेत्रीय अधिकारी संतोष गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
विषयावर सखोल मार्गदर्शन
उष्मालाट उपायोजना व जनजागृती प्रकल्पाची सविस्तर माहिती इमरान माजिद यांनी तर अध्ययन प्रक्रियेबाबत श्रीमती ली यांनी दिली.
अनिल भटकर यांनी येणाऱ्या काळातील उष्माघाताच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त करत त्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रशासनाची भूमिका व जनतेचे सहकार्य या बाबत मार्गदर्शन केले.
डॉ. धीरज साळुंखे यांनी उष्माघाताचे आरोग्यावर होणारे परिणाम, प्राथमिक उपचार व प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर माहिती दिली.
विविध घटकांचा सहभाग
या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध संस्था प्रतिनिधी, शेतकरी, शेतमजूर, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघना क्षीरसागर यांनी केले, सूत्रसंचालन रविकिरण मोरे यांनी केले तर आभार श्री. सोविक यांनी मानले.



