विहिरीत उतरले बापलेक; करंटचा शिकार

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडीमध्ये शुक्रवारी (दि. ५) सकाळी झालेल्या भीषण घटनेत बाप-लेकाचा करंटने विहिरीत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (४३) आणि त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (१७) यांचा समावेश आहे. सकाळी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेलेले सुदाम गाढवे बराच वेळ घरी परतले नाहीत. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी मुलगा भारत विहिरीवर गेला. पाण्यात वडिलांचा हालचाल नसलेला देह दिसताच त्याने मित्राला हाक मारून विहिरीत उडी घेतली; परंतु पाण्यात उतरलेल्या विजेच्या करंटमुळे त्यालाही जीव गमवावा लागला.
ग्रामस्थांनी तत्काळ वीजप्रवाह बंद करून दोघांना बाहेर काढले आणि दवाखान्यात हलवले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायात कार्यरत असून ते दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत असत. भजनी मालिकेचे त्यांना विशेष ज्ञान होते. त्यांचा मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी येथे अकरावीचा विद्यार्थी होता.
या हृदयद्रावक घटनेने साबळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.



