Latest News

महादेवी हत्तीणींसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय; कोल्हापुरांना लवकरच आनंदवार्ता?

मुंबई : महादेवी हत्तीणीसंदर्भात मंत्रालयातून मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोल्हापूरकरांना लवकरच आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूरात महादेवी हत्तीण पुन्हा माघारी आणण्यासाठी मोठा लढा सुरू आहे. इतकेच या हत्तीणीच्या प्रेमापोटी कोल्हापूरकरांनी जिओ पेट्रोल-डिझेलच नाही तर जिओच्या टेलिकॉम सेवेवर सुद्धा बहिष्कार घातला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय झाला? काय म्हणाले शेतकरी नेते राजू शेट्टी, जाणून घ्या.

हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
आज महादेव हत्तीणीसंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. हत्तीण वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण हत्तीण परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीला अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर उपस्थित होते. प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल, अशी मोठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. हत्तीणाची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल आणि तसेच सुप्रीम कोर्टात ही भूमिका मांडेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेसक्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकारही बाजू मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.

सरकार सकारात्मक
माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकारही बाजू मांडणार असल्याची माहिती या बैठकीनंतर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

आता राज्य सरकार ही बाजू मांडणार
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पार्टी होण्याचा निर्णय घेतला आहे. आधी मठ आणि पेटा पार्टी होती. आरोग्य रिजनसाठी हायपावर कमिटी केली होती. अशात, यासंदर्भात आता शासन लक्ष घालेल. जबाबदारी शासन घ्यायला तयार आहे. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा विचार करत पार्टी होण्याचा निर्णय घेतलाय. लोकआग्रहास्तव हा निर्णय शासनाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती सेनेचे धैर्यशील माने यांनी दिली.

हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत येईल
मुख्यमंत्री यांनी सर्वांना आश्वासित केलंय की आम्ही जनभावनेबरोबर आहोत सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयात सरकार पार्टी नव्हतं. अशात, वनतारात जशी व्यवस्था आहे तशी सुविधा महाराष्ट्राचे वनखाते आणि शासन उभी करणार आहे. आमची हत्तीण परत नांदणी मठात येईल असं वाटतं. दुसरं लोकांच्या जनभावनेचा रोष झाला होता अशात काही तरुणांवर केसेस दाखल झाल्या होत्या. त्या मागे घेण्यासंदर्भात देखील बोलणं झालं आहे, असे आमदार राहुल आवाडे म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. वकिलांसोबत बोलल्यानंतर आम्ही यासंदर्भात भाष्य करु असे नांदणी मठाचे प्रतिनिधी म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button