हजारचा पाढा येत नाही म्हणून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून जबर मारहाण, संतप्त पालकांनी…

यवतमाळ : स्थानिक समर्थवाडी भागातील शंकरलाल कोठारी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला केवळ हजार चा पाढा येत नसल्याच्या कारणावरून प्राचार्यांनी पट्टीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विद्यार्थिनी आराध्या प्रमोद शिंदे असून, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची मुलगी आहे.
मनावर विपरीत परिणाम
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळच्या शंकरलाल कोठारी इंग्लिश मीडियम स्कूल येथे वर्गात विद्यार्थ्यांना पाढे म्हणण्यास सांगितले जात होते. आराध्याने ‘शंभर चा पाढा’ अचूक सांगितला, परंतु ‘हजार चा पाढा’ येत नसल्याचे लक्षात येताच प्राचार्यांनी पट्टीने तिला मारहाण केली. या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरलेली असून तिच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याचे पालकांनी सांगितले. या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनीही यासंदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. याशिवाय, एकाच इमारतीत दोन शाळा चालवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शिस्तीच्या नावाखाली लहान मुलांवर अत्याचार
पालकांचे म्हणणे आहे की, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे व शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे. या संदर्भात पालक, सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी दि. २५ जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित प्राचार्यांविरोधात आणि शाळेविरुद्ध तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. शाळांमध्ये सतत विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा केल्या जाण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शाळांमध्ये शिस्तीच्या नावाखाली लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी सध्या होत आहे.
पाठीवर उमटले वळ
शाळेची शिस्त चांगली राहावी याकरीता अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांना रागावतात. अशा परिस्थितीत बहुतांश वेळा पालकांचा आक्षेप राहत नाही. मात्र अशा पध्दतीने पाठीवर वळ उठे पर्यंत मारहाण करणे संतापजनक आहे. या शाळेत अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्यामुळे शिक्षण विभागाला निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. मारहाणीचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वच शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत गंभीर विचार करणे गरजेचे असल्याचे प्रमोद शिंदे यांनी म्हटले आहे.



