मेळघाटातील सिमेंट नाला बांधांवर निकृष्ट कामाचा आरोप; चौकशीची मागणी

धारणी तालुक्यातील अनेक गावांतील सीएनबी बंधारे पहिल्याच पावसात बाधित झाल्याचा दावा; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
अमरावती | प्रतिनिधी
मेळघाटातील धारणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधांच्या (सीएनबी) कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हरीसाल, बोरी, टीटंबा, झिल्पी, आखी, नागझिरा आणि झांजरीढाणा या गावांमध्ये लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेले बंधारे पहिल्याच पावसात बाधित झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
माहितीनुसार, ग्रामीण भागातील जलसंधारण वाढावे, भूजल पातळीत सुधारणा व्हावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या गावांमध्ये सुमारे २५ लाख रुपये खर्च करून सिमेंट नाला बांध उभारण्यात आले.
मात्र, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्याच पावसात अनेक बंधाऱ्यांची दुरवस्था समोर आली असून बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत त्यांनी खर्च झालेल्या निधीच्या तुलनेत प्रत्यक्ष काम समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रोजगार हमी योजनेतून मोठा निधी खर्च करण्यात आला असताना पहिल्याच पावसात बंधाऱ्यांची अशी अवस्था होणे चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधित कामांची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, कामात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, या आरोपांवर संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे.



