केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सर्व कर्मचाऱ्यांसाठी कौशल्याधारित कोर्सेस अनिवार्य; कामगिरी अहवालावर होणार परिणाम

नवी दिल्ली | प्रतिनिधी
केंद्र सरकारने सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यांच्या भूमिकेनुसार (role-based) कौशल्याधारित कोर्सेस पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या कोर्सेसचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरी अहवालावर (APAR) दिसणार असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली.
केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी (२ एप्रिल २०२६) राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सरकारने ‘competency-based capacity building’ म्हणजेच कौशल्याधारित क्षमताविकासाची पद्धत अवलंबली आहे.
या नव्या धोरणानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याने दरवर्षी आपल्या पद आणि जबाबदाऱ्यांनुसार आवश्यक असलेले कोर्सेस एका विशेष ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये भूमिका-आधारित शिक्षण, सतत कौशल्यविकास आणि कामाच्या गरजांनुसार प्रशिक्षण यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, कामकाज अधिक प्रभावी करणे आणि प्रशासनात आधुनिक कौशल्यांचा वापर वाढवणे हा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे सरकारी यंत्रणेत कौशल्यविकासाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



