बडनेरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची अडचण; प्रवेशद्वारासाठी दिशादर्शक फलकांची गरज

अमृत भारत योजनेअंतर्गत बडनेरा रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे स्टेशनचे सौंदर्य खुलले आहे. नवीन सुविधा, विस्तारित प्लॅटफॉर्म्स आणि प्रवाशांसाठी आधुनिक सोयीमुळे स्टेशनचे रूपडे बदलत आहे. मात्र, या सुधारणा होत असतानाही प्रवाशांसमोर एक महत्त्वाची समस्या उभी राहिली आहे – स्टेशनचा मुख्य प्रवेशद्वार नेमका कुठे आहे हेच स्पष्ट होत नाही.
नवीन वस्ती भागातील प्रवेशद्वार बाहेरून सहज न दिसल्याने अनेक प्रवाशांना स्थानिकांकडून किंवा वाहतूक पोलिसांकडून चौकशी करावी लागते. मुख्य रस्त्यापासून दोन्ही प्रवेशद्वार बऱ्याच आत असल्याने, आणि महत्त्वाच्या चौकांवर दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांना गोंधळ आणि गैरसोय सहन करावी लागते.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मागणी आहे की, स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार जयहिंद चौक आणि पोस्ट ऑफिस चौकाजवळ असावे किंवा कमीतकमी त्या ठिकाणी मोठे व स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत.
यावर रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून आवश्यक पावले उचलल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊन बडनेरा स्टेशनचे महत्त्व अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



