मराठा आरक्षणाच्या आदेशाविरोधात ओबीसींचा रस्त्यावर संताप

मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करून आरक्षणासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे. मात्र या आदेशामुळे ओबीसी समाज आक्रमक बनला आहे. हिंगोली जिल्ह्यात ओबीसी समाज बांधवांनी औंढा-जिंतूर राज्य मार्गावर रास्ता रोको करत सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पाच दिवसांचं उपोषण करत समाजाला आरक्षणाची मागणी केली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटचा आधार घेत शासन आदेश काढला. मात्र हा आदेश निघाल्यानंतर ओबीसी समाजात असंतोष उफाळून आला आहे.
ओबीसी समाजाने सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, “मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काढलेला जीआर तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी ओबीसी समाजाकडून निषेध नोंदवला जात असून, वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.



