Latest NewsMaharashtra

हनीट्रॅपच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा खुलासा, नाशिकची तक्रार आल्याचं फडणवीसांकडून मान्य, पण…

मुंबई : विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. गेल्या दोन दिवसांपासून एका हनीट्रॅपच्या प्रकरणाची चर्चा आहे. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी तर विधानसभेच्या सभागृहात थेट पेनड्राईव्ह दाखवला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या आरोपांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. हनीट्रॅप प्रकरणाची कोणतीही तक्रार आलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. ना हनी आहे, ना ट्रॅप आहे, असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले आहेत.

“कालपासून एका गोष्टीची सातत्याने चर्चा या सभागृहात होत आहे ती म्हणजे हनीट्रॅप. कोणतं हनीट्रॅप विरोधकांनी या सभागृहात आणलं ते मला समजतच नाही. नानाभाऊंनी कुठाल बॉम्बच आणला म्हणे. पण नानाभाऊ तो बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला पाहिजे ना? ना हनी आहे, ना ट्रॅप आहे. नानाभाऊ कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. इकडे आजी मंत्री आहे तिकडे माजी मंत्री आहे. आजी मंत्री आहे की माजी मंत्री आहे? कोण फसलं आहे हनीट्रॅपमध्ये? कुठल्याही आजी-माजी मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रार नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘नाशिकची एक तक्रार होती, पण…’
“हनीट्रॅप संदर्भातील एक तक्रार आली होती. नाशिकच्या संदर्भात ही तक्रार आली होती. एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात ही तक्रार होती”, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

“मला राजकारण कारायचं नाही. पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय, ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याच्यावर निवडणूक लढले आहेत”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांनी आपलं भूमिका मांडणं सुरुच ठेवलं.

“नानाभाऊ जाऊद्या, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की, अशाप्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा सभात्याग करायचा. नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्ताधारुढ पक्षाची बोलती बंद करुन टाकायची. पण जे नाहीच असं बोलू नये”, असं फडणवीस म्हणाले.

“विजय वडेट्टीवार यांना मी सांगतो, महाराष्ट्र याआधीदेखील सुसंस्कृत होता, तो आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त विष पेरत आहेत, त्यांनी लगाम लावण्याची आवश्यकता आहे. बाकी महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा इकते तिकडे जात नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातही गुन्हेगारी कमी झाली अशी माहिती सभागृहात दिली. राज्यातील गुन्हेगारी 6 टक्क्यांनी कमी झाली. तर नागपुरातील गुन्हेगारी 11 टक्क्यांनी कमी झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button