सलग अकराव्या दिवशी अमरावतीत उष्णतेचा कहर; तापमान ४६ अंशांच्या पुढे, जिल्ह्यात रेड अलर्ट

अमरावती : विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, सलग अकराव्या दिवशीही शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. आज अमरावतीचा पारा तब्बल ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी अमरावती जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य दिसून आले. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. उष्ण वाऱ्यांचा वेग वाढल्याने आणि तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला आणि मैदानी काम करणाऱ्या कामगारांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर कापड किंवा टोपीचा वापर करावा तसेच उष्णतेमुळे त्रास जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
शहरातील रुग्णालयांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकव्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. महापालिकेने विविध चौकांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली असून, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना सोशल मीडियाद्वारे देण्यात येत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तास विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



