‘भारत कधीही दहशतवादापुढे झुकणार नाही’; पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनी पंतप्रधान मोदींचा कडक इशारा

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका पुन्हा स्पष्ट केली. “भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे नापाक डाव कधीच यशस्वी होणार नाहीत,” असा ठाम इशारा पंतप्रधानांनी दिला.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात देशभरातून पर्यटनासाठी आलेल्या २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनी पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील संदेशात मृतांना श्रद्धांजली वाहिली. “गेल्या वर्षी आजच्या दिवशी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखातून सावरत असलेल्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, “संपूर्ण देश या दुःखात आणि निर्धारात एकजूट आहे. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादापुढे झुकणार नाही. दहशतवाद्यांचे अमानुष डाव कधीच यशस्वी होणार नाहीत.” त्यांच्या या विधानामुळे दहशतवादाविरोधातील केंद्र सरकारची ‘शून्य सहनशीलता’ भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली होती. या कारवाईत अनेक दहशतवादी तळ आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
या स्मृतिदिनी देशभरात हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहलगाम परिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, हल्ल्याच्या आठवणी अजूनही नागरिक आणि पीडित कुटुंबांच्या मनात जिवंत असल्याचे दिसून आले.



