“२३ कोटींचा निधी परत का?” — नंदगिरी किल्ल्यावरून सदाभाऊ खोतांचा थेट सवाल!

नांदेड (१० एप्रिल २०२६) :
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला आज राजकीय आणि प्रशासनिक चर्चेचं केंद्र बनला. अंदाज समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी किल्ल्याला भेट देत संवर्धन कामांचा आढावा घेतला आणि किल्ल्याच्या विकासासाठी मंजूर झालेले २३ कोटी रुपये परत का गेले? असा थेट सवाल उपस्थित केला.
या पाहणीदरम्यान एक सकारात्मक बाबही समोर आली. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी स्वतः पुढाकार घेत वर्दीत राहून किल्ल्याच्या संवर्धनासाठी केलेल्या कामाचं खोत यांनी विशेष कौतुक केलं. त्यांच्या पुढाकारातून स्थानिक तरुणांना एकत्र करत ‘किल्लेदार’ नावाचा गट तयार करण्यात आला असून, सुमारे ४० युवक या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
मात्र, या प्रयत्नांदरम्यान एक गंभीर मुद्दा उघड झाला. किल्ल्याच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला तब्बल २३ कोटी रुपयांचा निधी वापरला न गेल्याने परत गेला आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत, त्यांच्या उदासीनतेमुळेच विकासकामे रखडल्याचा आरोप केला.
“नंदगिरी किल्ल्यासाठी २३ कोटींचा निधी मंजूर झाला होता, पण तो परत जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. स्थानिक पातळीवर इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे विकास अडला आहे. मात्र प्रशासन आणि तरुणांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
❗ मोठा प्रश्न :
एकीकडे प्रशासन आणि तरुणांचा उत्साह…
तर दुसरीकडे राजकीय उदासीनता…
नंदगिरी किल्ल्याचा विकास नेमका अडतोय कुठे?
हा प्रश्न आता सर्वांसमोर उभा ठाकला आहे.



