वाशिममध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

वाशिम जिल्हा मध्ये अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली… तर काही भागात गारपिटीनेही तडाखा दिला.
आज दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक आकाशात ढग दाटून आले… आणि काही क्षणांतच वातावरणात मोठा बदल झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
काढणीसाठी तयार असलेला गहू, हरभरा आणि कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, आंबा आणि इतर फळपिकांवरही गारपिटीचा गंभीर परिणाम दिसून येत आहे.
आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस आणखी एक मोठं संकट ठरत आहे. कष्टाने उभं केलेलं पीक काही मिनिटांत उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असून, शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभं ठाकलं आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



