‘काय बोली राह्यली…’ मृणाल ठाकूरचा अस्सल अहिराणी तडका! अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मृणालने तिच्या भाषेच्या कौशल्याने सर्वांनाच चकीत केले आहे. खान्देशची शान असलेल्या ‘अहिराणी’ भाषेत मृणालने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आहे.
नक्की काय घडलं?
मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी त्यांच्या आगामी ‘दो दिवाने सहर मै’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. एका इव्हेंट दरम्यान, समोर असलेल्या एका पत्रकाराने मृणालशी थेट तिच्या मातीतील भाषेत म्हणजेच अहिराणीत संवाद साधला.
पत्रकाराने विचारलेला प्रश्न:
“तुला सर्वात जास्त काय आवडतं? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी?”
मृणालचं भन्नाट उत्तर आणि सिद्धांतची ‘ती’ रिअॅक्शन
हा प्रश्न ऐकताच मृणालला हसू आवरले नाही. तिने वेळ न घालवता अस्सल अहिराणी ढंगात उत्तर दिले: “काय बोली राह्यली! अडीच वाजीगयना, जेवायना शे मले. वांग्यानं भरीत पहिले… एखादी बट्ट जोडे.” (काय बोलतोयस! अडीच वाजलेत, मला जेवायचं आहे. आधी वांग्याचं भरीत आणि सोबत एखादी बट्टी.)
मृणालचा हा मराठमोळा आणि गावरान अंदाज पाहून शेजारी बसलेला अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी देखील अवाक झाला. मृणाल इतकी अस्खलित अहिराणी बोलू शकते, हे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
मृणाल जरी आज बॉलिवूड आणि साऊथ गाजवत असली, तरी तिची नाळ आजही आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी घट्ट जोडलेली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होताच “खान्देशची लेक” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अभिनेत्रीचा हा नैसर्गिक आणि बिनधास्त अंदाज नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे.
‘दो दिवाने सहर मै’ लवकरच भेटीला
मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची फ्रेश केमिस्ट्री असलेला ‘दो दिवाने सहर मै’ हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मृणालच्या या अहिराणी व्हिडिओमुळे चित्रपटाची चर्चा अधिकच वाढली आहे.



