“मुंबईत ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचून उद्योजक आणि त्यांच्या पत्नीची ५८ कोटी रुपयांची फसवणूक”

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२५ – मुंबईत एका उच्चभ्रू उद्योजक आणि त्यांच्या पत्नीला ‘डिजिटल अरेस्ट’ दाखवत तब्बल ५८ कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर क्राइम पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, पैसे कुठे ट्रान्सफर झाले याचा तपास सुरू आहे.
आरोपींनी ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) चे अधिकारी असल्याचे भासवत पीडित उद्योजक दांपत्याला मनी लॉन्डरिंगच्या खोट्या प्रकरणात अडकल्याचे सांगितले. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली त्यांना विविध कारणांनी पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उद्योजकाने आरटीजीएस (RTGS) द्वारे तब्बल ५८.१३ कोटी रुपये आरोपींकडे ट्रान्सफर केले. हे पैसे १८ बँक खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात अब्दुल नासीर खुल्ली, अर्जुन कडवासरा, आणि जेठाराम कडवासरा या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम विभाग करत असून, अजूनही काही आरोपी फरार असण्याची शक्यता आहे.



