अमरावतीत धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमरावती – धनगर समाजाला घटनात्मक अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्याच्या मागणीने आज पुन्हा जोर धरला. जालना येथे गेल्या सहा दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यांना पाठिंबा देत आज अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने जमला. मोर्चादरम्यान समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली – “धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे”, “आश्वासन देऊनही आरक्षण दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” मोर्चात बोलताना नेत्यांनी सांगितले की सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते. मात्र, आज १० वर्ष उलटूनही तो शब्द पाळला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाने निवेदनाद्वारे शासनाला दोन दिवसांची मुदत दिली असून बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे. तसेच बोऱ्हाडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, असे स्पष्ट करण्यात आले.



