बांधावर घातलेल्या तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव; ऊसाच्या संरक्षणासाठी सोडला होता विद्युत प्रवाह

शेतात लागवड केलेल्या पिकांचे वन्य प्राणी तसेच रान डुक्कर मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात, हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून तारेचे कंपाउंड टाकून त्यात विद्युत प्रवाह सोडला जात असतो.
बालाजी सुरवसे
धाराशिव : शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेताच्या चारही बाजूनी तारेचे कंपाउंड करत असतात. इतकेच नाही तर त्यात विद्युत प्रवाह देखील सोडलेला असतो. मात्र हा प्रकार अनेकांच्या जीवावर बेतत असतो. असाच प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला असून शेताच्या बांधावर विद्युत प्रवाह सोडलेल्या तारेला स्पर्धा झाल्याने एका शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी गावात हि घटना घडली असून यात गुणवंत बलभीम कागे (वय ३२) असे मृत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान उसाचे डुकरा पासून संरक्षण व्हावे; म्हणून शेतकऱ्याने ऊस लागवड केलेल्या शेताच्या बांधावर तारेचे कंपाउंड घातले आहे. तसेच या तारांमध्ये विद्युत प्रवाह देखील सोडलेला आहे. जेणेकरून डुक्कर उसामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.
तारेला स्पर्श झाल्याने जीवावर बेतले
मात्र बांधावर लावलेला वीज प्रवाहित तार कंपाउंडचा शॉक लागल्याने गावातीलच एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जेवळी गावातील शेतकऱ्याने डुकरापासून उसाचे संरक्षण व्हावे म्हणून तारेच्या कंपाउंड मध्ये वीज प्रवाह सोडला होता. मात्र या तारेला स्पर्श झाल्याने गावातील गुणवंत बलभीम कागे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान घटनेची माहिती गावात माहिती झाल्यानंतर ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. यानंतर तरुणाला रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर तारेच्या कंपाऊंडमध्ये करंट सोडणाऱ्या या शेतकऱ्याविरुद्ध लोहारा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



