धनखड यांचा राजीनामा जबरदस्तीचा – पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले असले तरी, यामागे मोठा राजकीय डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. “हा राजीनामा नव्हे, त्यांना जबरदस्तीने काढून टाकले गेले आहे,” असे सांगत चव्हाण यांनी सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वाद आणि संघर्षाकडे लक्ष वेधले.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘दाल में कुछ काला’ आहे. त्यांना वैद्यकीय कारणं सांगून बाजूला करण्यात आलं आहे, पण खरं कारण वेगळंच आहे. सत्ताधारी पक्षात मोठा अंतर्गत वाद आणि सत्तेतील संघर्ष सुरू आहे, ज्याचा हा परिणाम आहे.”
चव्हाण यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपराष्ट्रपती पदासारख्या महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील राजीनाम्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केल्याने विरोधी पक्षांकडून यावर अधिक स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे.
जगदीप धनखड यांनी नेमक्या कोणत्या वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा दिला, याचा तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यामुळे या राजीनाम्याभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. आता सत्ताधारी पक्ष या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



