मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या समस्यांवर सखोल चर्चा; वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक

मेळघाट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विविध समस्या आणि रखडलेली विकासकामे यांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नुकतीच पार पडली.
या बैठकीत मेळघाटचे आमदार केवळराम काळे उपस्थित होते. त्यांनी मेळघाटमधील स्थानिक लोकांच्या अडचणी, विकासकामांचा अभाव, आणि प्रशासनिक अडथळ्यांबाबत सविस्तर निवेदन वनमंत्र्यांसमोर सादर केले.
चर्चेत आलेले प्रमुख मुद्दे:
बैठकीत पुढील महत्वाच्या विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली, जे वनविभागाच्या परवानग्यांअभावी रखडलेले आहेत:
- ३३ केव्ही जरीदा सब स्टेशन
- धुळघाट रेल्वे ते झरी रस्ता
- परतवाडा – धारणी महामार्गाचे अपूर्ण काम
- मोबाईल नेटवर्क अभाव – संपूर्ण मेळघाट क्षेत्रात सिग्नलची समस्या
- काकादरी – गरजदारी रस्त्याची निकृष्ट स्थिती
- चिखलदरा – मोथा – शहापूर – गोल मार्ग
आमदार काळे यांची भूमिका:
“दुर्गम व आदिवासी भागाच्या दळणवळणासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. यामुळे आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढतील,” असे मत आमदार केवळराम काळे यांनी व्यक्त केले.
त्यांनी यासंबंधित वनविभागाच्या परवानग्या तातडीने मंजूर करण्याची विनंती केली.
मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया:
वनमंत्री गणेश नाईक यांनी सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली असून, लवकरच आवश्यक निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे.



