वरुडमध्ये महिला कामावरून घरी जात असताना चाकू हल्ला! मिरची पूड टाकून जीवघेणा प्रयत्न;

वरुड : वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मिरची प्लॉट भागात बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली. आपल्या कामावरून घरी परतणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेला अज्ञात दोन इसमांनी थांबवून चाकू हल्ला केला.
काय घडलं नेमकं?
मिरची प्लॉट भागात राहणारी पीडित महिला नेहमीप्रमाणे आपल्या कामावरून घरी परतत असताना, तोंडावर कपडा बांधलेले दोन अज्ञात इसम अचानक तिच्यासमोर आले. त्यांनी तिच्या चेहऱ्यावर मिरची पूड टाकून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी, आरोपींपैकी एकाने तिला चाकूने गंभीर जखमी केलं. छातीखाली, पाठीच्या डाव्या बाजूला आणि गालावर वार करण्यात आले.
तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल
पीडितेची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक आणि तिचे नातेवाईक घटनास्थळी धावले. लोकांची गर्दी पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. जखमी महिलेला तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
पीडितेच्या ‘डी.डी. बयान’ (Dying Declaration) वरून वरुड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहितीदार, आणि गुप्त बातम्यांवर आधारित तपास सुरु आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
वरुड पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



