शेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं, बाप- मुलाने केली 5 जणांची निर्घृण हत्या

नवीन वर्षांच्या सुरुवातीला लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला आणि तिच्या चार मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. लखनऊतील हॉटेलमध्ये पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर हा घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेचा मुलगा अर्शदला अटक केली आहे. तर, महिलेचा पती फरार आहे. महिलेच्या पतीचाही या हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे कुटुंब मुळच ग्रा येथील असून ते नववर्ष साजरं करण्यासाठी लखनऊ येथे आलं होतं.
नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये आलिया (9), आलिशा (19) अक्सा (16), रहेमान (18) आणि त्यांची आई अस्मा यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्शद याचे शेजाऱ्यांसोबत वाद होते. त्यामुळं संपूर्ण कुटुंबाला शेजारी राहणारे कुटुंब त्रास देत होते. त्यामुळं आरोपीला भीती होती की त्याच्यानंतर शेजारी त्याच्या कुटुंबाला त्रास देतील या भीतीने त्याने कुटुंबीयांना जीवे मारण्याचा कट रचला. अर्शद त्याच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन अजमेर येथे घेऊन गेला. नंतर ते लखनऊ येथे आले. लखनऊला ते हॉटेलमध्ये उतरल्यानंतर अर्शदने त्यांना दारू दिली. त्यानंतर एका कपड्याने त्यांचे तोंड बांधले आणि धारदार शस्त्राने त्याने कुटुंबीयांच्या हातावर वार केले. या सर्व गुन्ह्यात त्याच्या वडिलांनीच साथ दिल्याचेही समोर येत आहे. हत्येनंतर अर्शदने त्याच्या वडिलांना रेल्वे स्थानकात सोडून आला आणि पोलिसात जावून हजर झाला.
आरोपी अर्शदनेच पोलिसांत हत्येची कबुली दिली आहे. अर्शदच्या कबुलीनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र, ब्लेड आणि स्कार्फ ताब्यात घेतले आहेत. अर्शदचे वडिल हे सध्या बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. या हत्या प्रकरणातील सर्वबाजूने पोलिस तपास करत आहेत. पोलसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
अर्शद सातत्याने त्याचे जबाब बदलत असल्याचे समोर आले आहे. एकदा त्याने पोलिसांकडे गुन्हा कबूल केला होता. तर, नंतर त्याने हत्येचा कट वडिलांनी रचला असून त्यांनी या हत्या केल्या आहेत. मात्र मी कसं तरी त्यांच्या तावडीतून बचावलो आणि वडिल घटनास्थळावरुन पसार झाले. तसंच त्याचे वडिल आत्महत्या करु शकतात, असंदेखील त्याने म्हटलं आहे. त्यामुळं नेमका या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे याची चौकशी पोलिस करत आहेत.



