पुसद मतदारसंघात एसआयआर डिजिटल नोंदणीला वेग; १८ दिवसांत ६६ टक्के उद्दिष्ट पूर्ण

विशेष मतदार पुनरीक्षण अभियानाला चांगला प्रतिसाद; उर्वरित १२ दिवसांत शंभर टक्के नोंदणीचे लक्ष्य
पुसद (यवतमाळ) | प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरीक्षण अभियानांतर्गत पुसद विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या एसआयआर (Special Intensive Revision) डिजिटल नोंदणी मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या १८ दिवसांत ६६ टक्के नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित १२ दिवसांत शंभर टक्के नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २३ हजार ६५७ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८१ हजार ४९५ एसआयआर अर्जांचे वितरण करण्यात आले आहे.
यापैकी आतापर्यंत २ लाख १३ हजार ८८३ अर्ज प्राप्त झाले असून त्यांची डिजिटल नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीचे प्रमाण ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यवतमाळ जिल्हा राज्यात नोंदणीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मात्र, पुसद शहरातील काही मतदान केंद्रांवर नोंदणीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले असून त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उर्वरित मतदारांची नोंदणी वेळेत पूर्ण करण्यासाठी ३४३ बीएलओ, ३५ पर्यवेक्षक, १३ सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) तसेच इतर कर्मचारी कार्यरत आहेत.
नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी येत्या रविवारी मतदारसंघातील सर्व ३४३ मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये मतदारांना अर्ज भरणे आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित प्रक्रियेनुसार आवश्यक एसआयआर अर्ज वेळेत न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक ठेवण्यासाठी विशेष मतदार पुनरीक्षण अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सहभागी होऊन वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.


