अजिंठ्यात मोहरम उत्सवाला भक्तिभावाचे स्वरूप; ६० सवाऱ्यांच्या पारंपरिक विसर्जनाची आज सांगता

दीडशे ते दोनशे वर्षांची हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा कायम; राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातमधून हजारो भाविकांची उपस्थिती
अजिंठा | प्रतिनिधी
मोहरम उत्सवानिमित्त राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अजिंठा शहरात यंदाही मोहरम उत्सव धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा होत आहे. सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपासून सुरू असलेली हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली असून, शहरात एकूण ६० सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे. आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने सवाऱ्यांचे विसर्जन होणार आहे.
अजिंठ्यातील मोहरम उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. यंदा शहरातील विविध भागांत हिंदू बांधवांच्या ७ आणि मुस्लीम बांधवांच्या ५३ अशा एकूण ६० सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही श्रद्धा आणि उत्साहाने जपली जात आहे.
मोहरम उत्सवानिमित्त मराठवाडा, विदर्भ, खान्देश, मध्य प्रदेश तसेच राज्यातील विविध भागांतून हजारो भाविक अजिंठ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असून व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शहरातील इमामबाडा, हुसेनी मोहल्ला, त्रिपोला गल्ली, खडक मोहल्ला, जामा मशीद परिसर आणि शिवणा गेट या भागांमध्ये विविध सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे. सातवा, आठवा आणि नववा मोहरम या दिवशी पारंपरिक भेटी, धार्मिक विधी आणि मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या.
नवव्या मोहरमनिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरून विविध सवाऱ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक धार्मिक विधी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.
आज मोहरमच्या दिवशी नाले हैदर, पंजा, बुराख यांसह विविध सवाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, गुजरातमधील सुरत तसेच नागपूर, अकोला, खामगाव, जालना आणि मालेगावसह विविध भागांतून हजारो भाविक उपस्थित आहेत.
उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक त्या सर्व तयारी पूर्ण केली आहे.
हिंदू-मुस्लीम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम असलेला अजिंठ्याचा मोहरम उत्सव आजही राज्यभरातील भाविकांसाठी श्रद्धा, विश्वास आणि सामाजिक एकतेचे प्रेरणास्थान ठरत आहे.



