रावेरमध्ये शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! विहिरीतून मोटार केबल चोरीचा सुळसुळाट

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या एक नवीन आणि गंभीर संकट उभं राहिलं आहे. पावसाअभावी नव्हे, तर चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
कर्जोद शिवार आणि परिसरात विद्युत मोटार केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मोटार केबलच आता चोरट्यांच्या निशाण्यावर आली आहे. शुक्रवारी रात्री वाघोड परिसरात चोरट्यांनी तब्बल पाच ते सहा विहिरींवरील मोटारींच्या केबल स्टार्टरपासून थेट विहिरीपर्यंत कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी पिकं करपण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या दिवसा वीजपुरवठा सुरू असल्यामुळे रात्रीच्या अंधारात चोरट्यांना मोकळीक मिळत असल्याचेही समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. आता संतप्त शेतकरी पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करून या चोरींवर आळा घालण्याची मागणी करत आहेत.
👉 एकीकडे निसर्गाशी झुंज… आणि दुसरीकडे चोरांचा वाढता धोका… रावेरमधील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. आता प्रशासन किती लवकर पावलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



