वाघोड गावातील अतिक्रमणविरोधी अमरण उपोषण मागे

रावेर तालुक्यातील वाघोड गावात सुरू असलेले अतिक्रमणाविरोधातील अमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते गजानन प्रकाश तायडे यांनी आपले उपोषण सोडले. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार पुढील कारवाई होणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.
वाघोड गावातील दुर्गा नगर परिसरात प्लॉट क्रमांक 527/अ, 527/ब आणि 490 येथे सुरू असलेल्या नवीन बांधकामात अतिक्रमण होत असल्याचा आरोप गजानन तायडे यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा केला होता. याच कारणामुळे त्यांनी सोमवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते.
दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी दोन वेळा उपोषण मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर बुधवार संध्याकाळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन गोपनीय पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मध्यस्थीने ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील व सरपंच संजय मसाने यांनी लेखी आश्वासन दिले.
या लेखी आश्वासनानंतर सरपंच संजय मसाने व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन गजानन तायडे यांचे अमरण उपोषण सोडविण्यात आले.
अतिक्रमणाच्या तक्रारीवर लेखी आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अतिक्रमणावर कारवाई होणार का, हा प्रश्न अद्याप कायम असून, याकडे संपूर्ण वाघोड गावाचे लक्ष लागून आहे.



