रेल्वेने जोडणार दोन महत्त्वाची देवस्थाने, महाराष्ट्रातील या प्रमुख देवस्थळाचा समावेश, रेल्वेच्या 18 विशेष सेवा

साईनगर शिर्डी तिरुपती विशेष रेल्वे : भारतातील दोन देवस्थाने आता ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शिर्डी आणि तिरुपती बालाजी यादरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक जण साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला येतात. त्यामुळं या दोन देवस्थानादरम्यान रेल्वे सोडण्यात आल्यास प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
साईनगर शिर्डी ते तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या 18 फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांत 07638 साप्ताहिक रेल्वे दर सोमवारी 4 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या कालावधीत संध्याकाळी 7.35वाजता साईनगर शिर्डी येथून सुटणार आहे. तिसऱ्या दिवशी रात्री 1.30 वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक 07637 साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर रविवारी 3 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर या कालावधीत पहाटे 4 वाजता तिरुपतीहून सुटणार आहे. तर, साईनगर शिर्डी येथे 10.45 वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल.
कोणत्या रेल्वे स्थानकांवर थांबेल?
कोपरगाव, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद,जालना, सेलू, परभणी. गंगाखेळ, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भाळकी, बीदर, झहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनपल्ले, तेनाली, चिराला, ओंगोल, गुडूर आणि रेणेगुंटा येथे थांबा देण्यात येणार आहे.
कशी असेल रेल्वेची रचना?
या रेल्वेगाडीची रचना 2 वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, 6 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 1 द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन अशी असणार आहे. या विशेष रेल्वेगाडीच्या आरक्षणाची सुविधा 1 ऑगस्टपासून ऑनलाइन आणि बुकिंग तिकीट केंद्रावर तसंच, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



