संजय राऊतांचा खळबळजनक दावा: ‘विधीमंडळात आमदाराचा जीव घेण्याचा कट’

मुंबई : आताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये विधीमंडळामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्य कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली. दोघांमध्ये झालेल्या वादाची राज्यभर चर्चा पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
विधीमंडळाच्या आवारामध्ये ज्या घटना घडल्या त्या कधीच घडणार नाहीत. त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अधपतन सुरू आहे, त्याला भाजप पक्षाची धोरणे कारणीभूत आहेत. उद्या जरा दाऊद इब्राहिम मुंबईत आला आणि यांच्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते. बोलतील तो इतके वर्षे भारतामध्ये नाहीये. त्याच्यावर गुन्हा नाहीये. छोटा शकील दाऊद, टायगर मेमन यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि पक्षात प्रवेश दिला जाईल, कारण त्यांना आमच्यासारख्या विरोधकांना संपवायचं आहे. कायदेशीर किंवा लोकशाही मार्गाने नाही तर बळाचा किंवा शस्त्राचा वापर करून संपवायचंय. आम्हीतर वारंवार सांगत आहोत की, विधानभवनामध्ये एका आमदाराची हत्या करायची होती. मकोकाचे आरोपी, खून प्रकरणातील आरोपी आतमध्ये आले. विधीमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करता. ते सगळे संबंधित कोणाचे आहेत? तुमच्याच आमदाराच्या पण तुमच्या आमदाराची हिंमत कशी वाढते. त्याच्यावरसुद्धा अशाच प्रकारचे खटले आहेत.
तुम्ही गुन्हेगारांची भरती केलीय, भाजप पक्ष हा गुन्हागारांचं आश्रयस्थान झाला आहे. गुन्हा करायचा त्यांच्या पक्षात जायचं आमदार, खासदार किंवा नगरसेवक व्हायचं नाहीतर संरक्षण घ्यायचं ही या राज्याची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या कोणत्या गप्पा करताय? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संपूर्ण मुंबईचा सातबारा गुजरातचा लाडका उद्योगपती असलेल्या गौतम अदानींच्या हातात देताय. मुंबईतील गिरणी कामगार कर्जत, वांगणी आणि शेलूच्या पूढे फेकला जात आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाची घर घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही. मुंबई मराठी माणसाची होईल? लोढा हे तुमच्या पक्षाचे आहेत त्यांनी जमिनी घेऊन ठेवल्याचं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.



