दोन म्हशी ठार

अकोट तालुक्यातील अकोली जहागीरजवळील रुधाळी चिंचोना शेतशिवारात विजेच्या तारांचा शॉक लागून दोन म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे पडलेल्या लाईनच्या जिवंत तारेवर गुरे चरायला गेलेल्या म्हशींचा मृत्यू झाला. सुदैवाने एक गाय वेळेवर वाचवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोली जहागीर अकोलखेड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थानजवळील गट क्र. ८९ मध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे वीज तारांवर पडल्यामुळे वायर तुटून जमिनीवर पडल्या. हे लक्षात न आल्याने गवळी समाजातील गोपाल श्रावजी येवले यांचे कुटुंब त्याच भागात मुक्कामी राहत असलेल्या निलेश गजानन टोहरे (अकोलखेड) यांच्या शेतातील हेटीवर आपली गुरे चारण्यासाठी गेले होते.
यावेळी दोन म्हशी जिवंत तारेवर चुकून गेल्याने त्यांना शॉक बसून जागीच मृत्यू झाला. मात्र गोपाल येवले यांचा मुलगा दुर्गेश येवले याने प्रसंगावधान राखत धैर्याने शॉक देणाऱ्या तारेला शाल पांघरून एक गाय बाजूला ओढली आणि तिचा जीव वाचवला.
या घटनेत जवळपास १.५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, गवळी कुटुंबाची उपजीविका केवळ दुधावर असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.
घटनास्थळी विद्युत विभागाचे प्रभारी सहाय्यक अभियंता उद्देश शेंद्रे, त्यांची टीम, पटवारी नरेश रतन, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खोडवे यांनी तात्काळ भेट देत पंचनामा केला.
या वेळी अकोली जहागीरचे अविनाश बघिले, अकोलखेडचे नितीन तळोकार, अंबाडीचे गोमा पारखे, विक्रांत खडके, बोरी कोहा कुंडचे मोहन खडके, तसेच परिसरातील सुनील येवले, गौरव येवले, रतन काळे, अमोल खडके यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रशासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाईची कार्यवाही व्हावी, अशी मागणी गवळी समाजातर्फे करण्यात येत आहे.



