लातूरमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट; टोमॅटो शेतीचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा कहर केला असून भाजीपाला शेतीला मोठा फटका बसला आहे. विशेषतः चाकूर तालुक्यातील वडवळ परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील उभ्या टोमॅटो पिकावर मोठा परिणाम झाला. गारांच्या तडाख्यामुळे टोमॅटो फळे जखमी झाली असून आता ती नासाडी होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पिक अक्षरशः वाया जाण्याची वेळ आली आहे.
याशिवाय, आधीच बाजारात टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातच आता झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीत शासनाने लवकरात लवकर मदतीचा हात दिला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.



