अमरावती मनपा निवडणूक: काँग्रेसकडे उमेदवारीसाठी मोठी गर्दी; 275 इच्छुकांचे अर्ज दाखल

अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेस पक्षाने तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवार, 18 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत काँग्रेसकडे तब्बल 275 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या असून, गुरुवारी सकाळपासूनच ही प्रक्रिया राबवण्यात आली. उमेदवारांची संघटनात्मक ताकद, जनसंपर्क, तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांवर मुलाखती घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या मुलाखत प्रक्रियेदरम्यान खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसकडून यावेळी उमेदवारांची काटेकोर निवड केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून, इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या ही पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



