“औसा पंचायत समिती कर्मचारी वेळेवर येत नाहीत | नागरिकांचा संताप |”

लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेच्या शिस्तीचा भंग होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सकाळी 9.45 वाजता सुरू होणारे हे शासकीय कार्यालय वेळेवर सुरू होणे दुर्मिळच झाले असून, नागरिकांच्या म्हणण्यानुसार बहुतेक कर्मचारी साडेदहा ते अकरा या दरम्यानच कार्यालयात दाखल होतात. परिणामी, नागरिकांची सरकारी कामे वेळेत होत नाहीत आणि त्यांना दिवसभर प्रतीक्षेत बसावं लागतं.
औसा पंचायत समितीचे अधिकृत कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी निश्चित आहे. मात्र, शासकीय नियमांनुसार कर्मचारी किमान सकाळी 9.15 पर्यंत कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र या वेळेचे पालन होताना दिसत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की 15 मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवसाचा पगार कपात केला जाईल. हा नियम सर्व शासकीय कार्यालयांवर लागू असून, औसा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचा वेळेच्या शिस्तीतील हलगर्जीपणा लक्षात घेता, ते प्रशासनाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.



