मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकला धडकली, १ ठार, ५ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर, हातीवले टोल नाक्यावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत राजेश शेखर नायडू (३५, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील इतर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०२ ईझेड ४७४८ क्रमांकाची कार मुंबईतील मालाड येथून कणकवलीच्या भिरकोन्ड गावाकडे निघाली होती. नातेवाईकांकडे जाण्यासाठी सहा जण या कारमधून प्रवास करत होते. वाटेत चहा-नाश्ता केल्यानंतर पुढे जात असताना राजापूर, हातीवले टोल नाक्यावर कारने एमएच १० ए डब्ल्यू ८१४४ क्रमांकाच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत कारचालक राजेश नायडू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जखमींना प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना कणकवलीला हलविण्यात आले आहे.
घटनास्थळी मुन्ना खामकर, राजू कुरूप, नरेन कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर आणि संदीप राऊत यांनी तत्काळ मदतकार्य केले. याप्रकरणी राजापूर पोलीसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.



