महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर : २९ जिल्ह्यांत १४.४४ लाख हेक्टर शेती बाधित

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुके व ६५४ महसूल मंडळांतील १४.४४ लाख हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या आपत्तीचा फटका विशेषतः सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यांसारख्या खरीप पिकांना बसला असून भाजीपाला, फळपिके, ऊस, कांदा, बाजरी, ज्वारी आणि हळद यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की, बाधित क्षेत्रांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. त्यांनी आश्वासन दिले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषत: १५ ते २० ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.



