राजकीय घडामोड: राज्य मंत्रिमंडळात खातेबदल, दत्तात्रय भरणे नवे कृषी मंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. मंत्रिमंडळातील दोन महत्त्वाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कृषी खात्याची जबाबदारी सांभाळणारे श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी श्री. दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
श्री. माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी ही खाती श्री. दत्तात्रय भरणे यांच्याकडे होती.
या खातेबदलामागचे कारण म्हणून, नुकतेच श्री. कोकाटे यांच्यावर विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. या दबावानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे समजते.
राजकीय वर्तुळात या बदलाकडे श्री. कोकाटे यांचे ‘डिमोशन’ म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, श्री. दत्तात्रय भरणे यांना कृषी सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीत हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.



