स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत इतवारा बाजारात विशेष जनजागृती उपक्रम

अमरावती : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 06, विलास नगर – मोरबाग परिसरातील इतवारा बाजार येथे विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला. या उपक्रमात फीडबॅक फाउंडेशनचे माननीय कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष डेमोद्वारे उपस्थित नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करणे, कचरा योग्य डस्टबिनमध्ये टाकण्याची पद्धत, तसेच घनकचरा व्यवस्थापनात जनतेची भूमिका यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम दरम्यान स्थानिक नागरिकांनी स्वच्छतेविषयी प्रचंड उत्साह व सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेकांनी प्रत्यक्ष सहभाग घेत उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी प्रभाग क्रमांक 06 चे स्वच्छता निरीक्षक श्री सय्यद व सचिन सैनी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छ परिसराचे महत्त्व अधोरेखित केले व नियमितपणे स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला असून, नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे स्वच्छ अमरावतीचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागणार आहे.



