शाळेची पहिली घंटा वाजली, विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक स्वागत!

अमरावती : राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, अमरावती शहरातील मनपा, जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सकाळी पहिली शाळेची घंटा वाजताच, शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. नवीन गणवेश, पुस्तकं, दप्तर घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते.
पर्यावरणपूरक उपक्रमांसह उत्साहात स्वागत
अमरावतीतील मनीबाई गुजराती हायस्कूल येथे “पर्यावरण प्रवेशोत्सव” उपक्रम राबवण्यात आला. मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत, फुलं देऊन आणि रोपं भेट देत स्वागत केले.
तसेच अंबा पेठ येथील मनीभाई गुजराती हायस्कूलमध्ये सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने शाळेत प्रवेश केला. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करत आणि ओक्षवंत लावून जंगी स्वागत करण्यात आले.
स्वच्छता व पर्यावरणाचे भान:
शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना रुमाल भेट देत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याला रोपटे भेट देत “एक विद्यार्थी – एक झाड” उपक्रमाची सुरुवातही करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या या उपक्रमांचे मनापासून स्वागत करत, पर्यावरण व स्वच्छतेबाबत सजग राहण्याचा निर्धार केला.



