हरवलेली २५ लाखांची दागिन्यांची बॅग हैदराबादमधून शोधली; अमरावती पोलिसांची संवेदनशील कामगिरी

पत्नीच्या निधनानंतर हरवलेल्या आयुष्यभराच्या आठवणी पुन्हा मिळाल्या; ३० तासांच्या तपासानंतर राजापेठ पोलिसांचे यश
अमरावती | प्रतिनिधी
पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच हरवलेली सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग अवघ्या काही दिवसांत शोधून काढत अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. सखोल तांत्रिक तपास आणि अथक प्रयत्नांनंतर हैदराबादमधून बॅग सुरक्षित हस्तगत करून ती संबंधित कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीतील शासकीय कर्मचारी गजानन वर्धे यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना २९ जून रोजी उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ३० जून रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
उपचारासाठी आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून गजानन वर्धे यांनी सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सोबत ठेवले होते. पत्नीच्या निधनानंतरच्या धावपळीत आणि मानसिक धक्क्यात दागिने असलेली बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
१ जुलै रोजी अमरावती येथे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दागिन्यांची बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. पोलिसांनी तांत्रिक तपास करत ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि विविध धागेदोरे जोडत तपासाची दिशा निश्चित केली.
या तपासादरम्यान पोलिसांचे पथक हैदराबादपर्यंत पोहोचले. सुमारे ३० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका हॉटेलमधून हरवलेली बॅग सुरक्षित अवस्थेत हस्तगत करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ती अमरावतीत आणून गजानन वर्धे यांच्या ताब्यात दिली.
दागिने परत मिळाल्यानंतर गजानन वर्धे भावुक झाले. त्यांच्या मते, हे केवळ सोन्याचे दागिने नव्हते, तर दिवंगत पत्नीच्या आयुष्यभराच्या आठवणी होत्या. त्या पुन्हा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या कारवाईमुळे अमरावती पोलिसांच्या तत्परतेचे, कार्यक्षमतेचे आणि मानवी संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या भावनांचाही आदर राखणाऱ्या या कामगिरीमुळे पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



