“ममता बॅनर्जी यांना हटवलं नाही तर बंगाल गमवावा लागेल”; हिमंता बिस्वा सरमांचा घणाघात

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ममता बॅनर्जी यांना सत्तेतून हटवलं नाही, तर बंगाल आपल्या हातातून निघून जाईल,” असे वक्तव्य त्यांनी केले.
शनिवारी कालिम्पोंग येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना हिमंता बिस्वा सरमा यांनी ममता बॅनर्जी सरकारवर बंगालची संसाधने “बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांसाठी” वापरल्याचा आरोप केला. “ममता बॅनर्जी यांनी बंगालचा संपूर्ण खजिना बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांसाठी राखून ठेवला आहे. मतांसाठी त्यांनी ही जमीन त्यांच्याकडे विकली आहे,” असा आरोप सरमा यांनी केला.
सरमा यांनी दावा केला की, आसाम आणि त्रिपुरातील भाजप सरकारांनी “बांगलादेशी घुसखोरांना” रोखण्यात यश मिळवलं आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये अशा घुसखोरीला अजूनही आळा बसलेला नाही, असे ते म्हणाले. “आसाम आणि त्रिपुरात आम्ही सीमा सुरक्षित केल्या. पण बंगालमध्ये अजूनही घुसखोरी सुरू आहे,” असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत, “त्यांना हटवणं गरजेचं आहे. अन्यथा बंगाल आपल्याकडून निघून जाईल,” असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे बंगालच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून या आरोपांना तीव्र विरोध करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी भाजपवर सीमांकन आणि घुसखोरीच्या मुद्द्यावरून बंगालमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा आरोप केला होता. त्यांनी भाजप देशाला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा केला आहे.



