अमरावतीत भीषण आग – ‘श्री साई मार्केटिंग’ दुकानासह मालवाहू टेम्पो जळून खाक

अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विलास नगर परिसरातील राम लक्ष्मण संकुलमध्ये असलेल्या ‘श्री साई मार्केटिंग’ या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानासह बाहेर उभा असलेला मालवाहू टेम्पोही पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
अमरावतीच्या विलास नगर ते के.एल. कॉलेज मार्गावरील राम लक्ष्मण संकुलमध्ये काल रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आगीचे लोळ उठताना दिसले. ‘श्री साई मार्केटिंग’ या कन्फेक्शनरी दुकानाला ही आग लागली होती.
दुकानाचे संचालक दुकान बंद करून घरी पोहोचले असतानाच त्यांना दुकानाला आग लागल्याची माहिती फोनवरून मिळाली. घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केले होते.
दुकानाच्या गेटच्या आत उभा असलेला मालाने भरलेला टेम्पोही या आगीच्या विळख्यात सापडला. काही क्षणांतच आग पसरत गेली आणि दुकानातील संपूर्ण कन्फेक्शनरी माल जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी लागलेल्या या भीषण आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.



