आरोग्य केंद्रातुन BP च्या गोळ्याच गायब

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बीपीच्या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच परत जावे लागत असून आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या औषधांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. या केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना बीपीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उच्च रक्तदाबाचा आजार हा दीर्घकालीन आणि गंभीर स्वरूपाचा असून रुग्णांना दररोज औषधे घेणे अत्यावश्यक असते. मात्र जेवनाळा आरोग्यवर्धिनी केंद्रात या औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत आहे. या केंद्रावर उपचार घेणाऱ्या अनेक गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत औषधांवरच उपचार अवलंबून असतात. मात्र औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने काही रुग्णांना खाजगी औषध दुकानातून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे. या प्रकारामुळे संतप्त रुग्णांनी शासन आणि आरोग्य विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तातडीने बीपीच्या गोळ्यांचा पुरवठा करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया मागितली असता, आम्हाला बोलण्याचा आणि माहिती देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
जेवनाळा आरोग्यवर्धिनी केंद्रात बीपीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत तातडीने औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.



