महावितरणच्या धोरणांविरोधात अमरावतीत सोलर व्यावसायिक व ग्राहकांचा मोर्चा

अमरावती (प्रतिनिधी) :
अमरावतीत सौर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक आणि ग्राहकांनी एकत्र येत महावितरणच्या धोरणांविरोधात जोरदार मोर्चा काढला. सोलर प्रकल्प बसवताना महावितरणकडून घालण्यात येणाऱ्या अटी आणि नियमांमुळे ग्राहक व व्यवसायिक त्रस्त झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शहरातील विविध भागातून आलेल्या सोलर व्यवसायिक आणि ग्राहकांनी हातात बॅनर व फलक घेत मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सौर ऊर्जा प्रकल्प बसवताना महावितरणकडून अनेक अटी घालण्यात येत आहेत. विशेषतः ग्राहकांनी आपल्या घरावर किती क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवावेत यावरही बंधने घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.
व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, या नियमांमुळे सोलर प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत असून ग्राहकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सौर ऊर्जेचा प्रसार होण्याऐवजी त्याला अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चेकऱ्यांनी शहरातील विविध मार्गांवरून घोषणाबाजी करत विद्युत भवनासमोर धरणे दिले. यावेळी महावितरणच्या धोरणांचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सोलर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सरकार व महावितरणने या क्षेत्रातील अडचणी दूर करून नियम सुलभ करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, या आंदोलनानंतर महावितरण प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



