अमित शाहांनी पियुष गोयलांना झापलं! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या विधानावरून ‘सज्जड दम’; गोयलांवर आली माफी मागण्याची वेळ

मुंबई/नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चा (अजित पवार गट) नवा उत्तराधिकारी कोण, यावरून मोठे काहूर माजले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून तर्क-वितर्क लढवले जात असतानाच, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या एका विधानामुळे दिल्ली ते गल्ली मोठी खळबळ उडाली. मात्र, या ‘घाई’मुळे पियुष गोयल यांना चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पियुष गोयल यांनी ‘पीटीआय’ला (PTI) दिलेल्या एका मुलाखतीत दावा केला होता की, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवारांनंतर नेतृत्व सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. मात्र, या विधानामुळे महायुतीत आणि विशेषतः राष्ट्रवादीत गोंधळ निर्माण झाला.
अमित शाहांचा ‘सज्जड दम’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रपक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य केल्यामुळे अमित शाह यांनी पियुष गोयल यांची कानउघडणी केली.
- नाराजी: “राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नियुक्तीबाबत भाष्य करण्याचा तुमचा अधिकार नाही, त्यासंदर्भात काहीही बोलायचं नाही,” अशा शब्दांत शाहांनी गोयलांना फटकारले.
- आदेश: भविष्यात मित्रपक्षांच्या संघटनात्मक निर्णयांवर कोणतेही वक्तव्य करू नये, असा सज्जड दमही त्यांना भरण्यात आला आहे.
पियुष गोयल यांचा ‘यू-टर्न’ आणि माफीनामा
अमित शाहांच्या तंबीनंतर पियुष गोयल यांनी तातडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली चूक मान्य केली. ते म्हणाले:
“एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती की प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाले आहेत. माहितीची खातरजमा न करता मी विधान केले, त्याबद्दल मी माफी मागतो. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.”
प्रफुल्ल पटेलांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, स्वतः प्रफुल्ल पटेल यांनीही पियुष गोयलांचा दावा खोडून काढला आहे. “माझ्या अध्यक्षपदाच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. राष्ट्रवादी हा लोकशाही मानणारा पक्ष असून असा कोणताही मोठा निर्णय ज्येष्ठ नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जातो,” असे पटेल यांनी स्पष्ट केले.



