T20 World Cup पूर्वी हेड कोच गौतम गंभीरने घेतला ब्रेक; टीम इंडियाला सोडून थेट गाठलं ‘हे’ शहर !

नवी दिल्ली: टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा बिगुल वाजायला आता काहीच दिवस उरले आहेत. या महाकुंभापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ४-१ अशा दणदणीत फरकाने जिंकून आपला इरादा स्पष्ट केला आहे. ३१ जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर, आता बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला छोटा ब्रेक दिला आहे. या ब्रेकमध्ये टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर नेमके कुठे गेले आहेत, याची सध्या जोरदार चर्चा आहे.
मिशन वर्ल्ड कपपूर्वी कौटुंबिक विसावा
न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर गौतम गंभीर थेट आपल्या घरी दिल्लीला पोहोचले आहेत. १ फेब्रुवारीच्या सकाळी त्यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पॉट करण्यात आले. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी मिळणाऱ्या या १-२ दिवसांच्या सुट्टीत गंभीर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहेत. जवळपास महिनाभराच्या व्यस्त शेड्युलनंतर मिळालेला हा ब्रेक मानसिक थकवा दूर करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
टीम इंडियाचे सराव सामने आणि वेळापत्रक
७ फेब्रुवारीपासून टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना यूएसए (USA) विरुद्ध होणार आहे. मात्र, त्याआधी संघ सराव सामन्यात आपली ताकद आजमावणार आहे:
- ४ फेब्रुवारी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई)
- २ फेब्रुवारी: भारत ‘अ’ विरुद्ध अमेरिका (सराव सामना)
- ६ फेब्रुवारी: भारत ‘अ’ विरुद्ध नामिबिया (सराव सामना)
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने वाढला आत्मविश्वास
शनिवारी झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २७१ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर आटोपला आणि भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून ७ फेब्रुवारीला घरच्या मैदानावर (भारत आणि श्रीलंका) होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी सज्ज झाला आहे.



