मीरारोडमध्ये तरुणीवर छेडछाड; संतप्त नागरिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

मीरारोडच्या काशीमिरा परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सकाळी मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड करण्यात आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. हा वाद मुलीच्या छेडछाडीतून झाल्याचं समोर आलं आहे. या वादानंतर सकाळच्या सुमारास काही संतप्त इसमांनी हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन येत मोठ्या प्रमाणावर रिक्षांची तोडफोड केली. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि उपद्रव माजविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्रीवरही लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली असून परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



