“ठाकरे बंधूंच्या युतीवर औपचारिक घोषणा लवकरच? राऊत म्हणाले, ‘चर्चा सकारात्मक सुरू आहे'”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी चर्चा करता दुष्काळ परिस्थितीपासून ते लाडकी बहीण योजनेपर्यंत आणि दुष्काळाच्या निकषांपासून ते ठाकरे बंधूंच्या युतीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीची घोषणा कधी होणार यासंदर्भातील तारखेचे सूचक संकेत राऊतांनी यावेळी दिल्याचं सांगितलं जात आहे. राऊत नेमकं काय म्हणालेत पाहूयात…
निकष बदलणं आवश्यक
“कॅबिनेट वर कॅबिनेट होत आहेत. एक कॅबिनेट तत्काळ लवाजमा न घेता पूरपरिस्थिती आहे तिथे घ्यायला हवी होती. कॅबिनेटला काय परिस्थिती आहे हे त्यांना समजलं असतं,” असं राउत यांनी आज होत असलेल्या कॅबिनेट बैठकीसंदर्भात म्हटलं आहे. “मुख्यमंत्री दिल्लीला गेले. पंतप्रधानांनी सांगितलं अहवाल पाठवा! अहवाल गेला का नाही माहीत नाही. मुख्यमंत्री एक-दोन दिवस त्या भागात होते. मदतीचे निकष आजच्या कॅबिनेटमध्ये बदलणं गरजेचं आहे,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेत ते आधी…
“दुष्काळ ओला आहे की सुखा हे आम्हाला माहित नाही. मात्र 5 ते 10 हजारांची मदत ही थट्टा आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत हवी आहे. हेक्टरी 50 हजार रुपये मदत हवी आहे. ही देण्याची मानसिकता मला मुख्यमंत्र्यांची दिसत नाही. बँकांकडून कर्जवसूली थांबवली पाहिजे. ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केले आहेत ते आधी वसूल करावेत. आधी त्यांना नोटीस पाठवावी मग शेतकऱ्यांना नोटीस पाठवावी,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदेंना मेळाव्यावरुन सुनावलं
दसरा मेळाव्यासंदर्भात राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी, “शिंदे यांचा दसरा मेळावा हा त्यांनी सुरत किंवा अहमदाबादला घ्यावा. जय शहा यांना त्यांनी बोलवावं” असा टोला लगावला. तुम्ही कोण आहात? बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेऊन मीच बाळासाहेब एवढा दाखवायचं बाकी आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री शिंदेंना लगावला. गुजरातमध्ये जाऊन त्यांनी मेळावा घेतला पाहिजे, असा टोलाही राऊतांनी शिंदेंना लगावला.
युतीच्या घोषणेची तारीख ठरली?
ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या घोषणेसंदर्भातही राऊतांनी सूचक विधान केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं आहे का? असा सवाल विचारण्यात आला असता राऊतांनी सूचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. “चर्चा आहे, चांगली चर्चा आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं,” असं सूचक विधान राऊतांनी केलं. “आमचा संघाचा दसरा मेळावा नाही. एक परंपरा आहे दसरा मेळाव्याची आमची. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही,” असं राऊत म्हणाले.
लाडकी बहीणवरुन टोला
लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना राऊतांनी, “आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले त्यांचा म्हणणं आहे की, आम्हाला गेल्या तीन महिन्यापासून पैसे मिळाले नाही. आता आम्हाला या सरकारचे पैसे नको आम्हाला मदत द्या पुरानंतर,” असं स्थानिक महिलांनी म्हटल्याचं सांगितलं.



