‘विकसित भारत बिल्डथॉन’ म्हणजे काय? विद्यार्थ्यांना मिळणार 1 कोटी जिंकण्याची संधी!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘विकसित भारत बिल्डथॉन 2025’ची घोषणा केलीय. हे एक देशव्यापी नवकल्पना कॅम्पेन असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि AICTE यांच्या माध्यमातून हे साकरतंय. काय आहे नेमकी ही योजना? याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार? जाणून घेऊया.
अभियानाचा उद्देश काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणात विकसित भारताच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावरून प्रेरणा घेत हे अभियान सुरु करण्यात आलंय. यातून देशाच्या नव्या पिढीत नवकल्पनेची संस्कृती जनचळवळीत रूपांतरित होणार आहे. चार प्रमुख विषयांवर—आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत—चर्चा होईल. यातून विद्यार्थ्यांना विचारमंथन, डिझाइन आणि प्रोटोटाइप विकासाची संधी मिळेल.
एक कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग
देशभरातील दीड लाख शाळांतील 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना (सहा लाख शाळांतील 12 कोटी संभाव्य सहभागी) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 2047 पर्यंतच्या विकसित भारतासाठी आयडीया देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या चळवळीचा भाग बनवण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी शिक्षणमंत्री म्हणाले.
सर्वांत मोठा शालेय हॅकॅथॉन
हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शालेय हॅकॅथॉन असून, गेल्या वर्षीच्या स्कूल इनोव्हेशन मॅरॅथॉन 2024 च्या यशावर आधारित असणार आहे. त्यातून विद्यार्थी इनोव्हेटर प्रोग्राम (SIP), विद्यार्थी उद्योजकता प्रोग्राम (SEP) आणि अटल टिंकरिंग लॅब्समधील पेटंट व स्टार्टअप्स उदयास आले. हे कॅम्पेन नव्या पिढीला सर्जनशील बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.
कशी करायची नोंदणी?
अभियानाची सुरुवात 23 सप्टेंबरपासून झाली असून, विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत विकसित भारत बिल्डथॉन पोर्टल वर नोंदणी करता येणार आहे. 6 ते 13 ऑक्टोबरपर्यंत शाळांसाठी तयारीचा कालावधी असून, शिक्षकांकडून विद्यार्थी गटांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना आणि प्रोटोटाइप सादर करावे लागतील.
विजेत्यांना 1 कोटींचं बक्षिस
या स्पर्धेतून 1 हजारहून अधिक विजेते निवडले जातील, ज्यांना विकसित भारताच्या लक्ष्यांसाठी योगदान देण्याची संधी मिळेल. हे अभियान नवीन शिक्षण धोरण 2020 च्या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांमधील समस्या सोडवण्याची क्षमता वाढवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. विजेत्यांमध्ये 10 राष्ट्रस्तरीय, 100 राज्यस्तरीय आणि 1000 जिल्हास्तरीय विजेत्यांना सन्मानित केले जाईल. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना एकूण एक कोटी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय.
१.) विकसित भारत बिल्डथॉन २०२५ म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय आहे?
विकसित भारत बिल्डथॉन २०२५ हे देशव्यापी नवकल्पना अभियान आहे, जे शालेय विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार थीम्सवर विचारमंथन, डिझाइन आणि प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी प्रेरित करते. याचा उद्देश २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नव्या पिढीला सर्जनशील बनवणे आहे.
२) या अभियानात कोण सहभागी होऊ शकतात आणि नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
देशभरातील १.५ लाख शाळांमधील छठवी ते बारावीच्या १ कोटीहून अधिक विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नोंदणी २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विकसित भारत बिल्डथॉन पोर्टल (https://vbb.mic.gov.in/) वर करता येईल. ६ ते १३ ऑक्टोबरदरम्यान शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कल्पना आणि प्रोटोटाइप सादर करण्यास तयार करतील.
३) या बिल्डथॉनमधून विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?
या अभियानातून १००० हून अधिक विजेते निवडले जातील, ज्यांना विकसित भारताच्या लक्ष्यांमध्ये योगदान देण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला चालना मिळेल. याशिवाय, अटल टिंकरिंग लॅब्समधील पेटंट आणि स्टार्टअप्ससारख्या संधी उपलब्ध होऊ शकतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा नवउद्योजकतेचा प्रवास सुरू होईल.



