काम करतो ना त्याचीच XX’; पूरग्रस्त शेतकऱ्यावर अजित पवारांचा संताप – “आम्ही काय गोट्या खेळायला आलोय?”

धाराशिव : पूराने त्रस्त झालेल्या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वेदनांना समजून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यात एक घटना चर्चेचा विषय ठरली आहे. धाराशिव जिल्ह्यातील देवगाव खुर्द येथे पूरग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधताना अजित पवार यांनी संतापाच्या भरात केलेलं वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.
पूराची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर
अजित पवारांनी भूम-परांडा परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गावागावात फिरून त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली, नुकसानग्रस्त शेतं, उद्ध्वस्त घरं प्रत्यक्ष पाहिली आणि शासनाच्या वतीनं मदतीचं आश्वासन दिलं.
“नुकसान किती मोठं आहे, याची मला जाणीव आहे. पंचनामे तातडीनं पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले.
पूरग्रस्त शेतकऱ्याच्या तक्रारीवर संताप
गावकऱ्यांशी संवाद साधताना, एका पूरग्रस्त शेतकऱ्याने मदत मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर अजित पवार चिडले आणि सर्वांसमोर माईकवरून उत्तर दिलं:
“आम्ही काय गोट्या खेळायला आलोय इथे? सकाळी सहा वाजता सुरुवात केलीय मी. जो काम करतो त्यालाच तुम्ही मारता!”
या विधानावर परिसरात उपस्थित काही लोक हसू लागले. त्यावर अजित पवारांनी पुढे म्हणाले:
“बघा आता! एवढं जीव तोडून सांगतोय. अजूनही एका ठिकाणी जायचं आहे. आम्हालाही कळतंय ना. आम्ही किती मदत करतोय… आज 45 हजार कोटींची मदत करतोय.”
त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.
दौऱ्याची पार्श्वभूमी – तिसऱ्या दिवशीही दौरा सुरू
अजित पवारांचा हा दौरा मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांसाठी तीन दिवसांचा आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी बीड जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव घाट इथून पाहणीस सुरुवात केली.
त्यांनी त्यांच्या अधिकृत X (Twitter) हँडलवरून पोस्ट करत माहिती दिली:
“पूरामुळे झालेलं नुकसान, नागरिकांवर आलेली संकटं प्रत्यक्ष पाहिलीत. पूल आणि परिसराच्या पाहणीनंतर पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या धोक्यांवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही पूरग्रस्त उपेक्षित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.”
राजकीय प्रतिक्रिया काय?
अजित पवारांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. एका बाजूला ते पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होताना दिसतात, तर दुसरीकडे सामान्यांच्या भावना ऐकताना अस्वस्थ होऊन प्रतिक्रिया देणं काहींना खटकलं आहे.



