मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यात महत्त्वाची कलाटणी; सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशाला दिली स्थगिती

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आरोपींना सध्या तुरुंगात परत पाठवले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, पुढील निर्णयानुसार गरज भासल्यास ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात जावं लागू शकतं. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता अजून अंतिम मानली जाऊ शकत नाही. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे अशीही मागणी केली होती की, मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय इतर कोणत्याही मोक्का (MCOCA) खटल्यांमध्ये उदाहरण म्हणून वापरू नये. या मुद्द्यावरही न्यायालयाने राज्य सरकारच्या मागणीला विचारात घेतलं आहे. ही सुनावणी आणि निर्णय केवळ या खटल्यापुरते मर्यादित राहतील, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.



